Capacity Building Programme of National Mission on Libraries for Public Library Personnel
वर्धा येथे राष्ट्रीय ग्रंथालय अभियानाच्या ४७व्या पाच दिवसीय क्षमता निर्मिती कार्यक्रमाचे उद्घाटन
छापील शब्दांचे महत्त्व कधीही कमी होणार नाही : कुलगुरू प्रो. सिंह
वर्धा, 7 ऑक्टोबर 2024
महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाचे कुलगुरू प्रो. कृष्ण कुमार सिंह म्हणाले की छापील शब्दांचे महत्त्व कधीही कमी होणार नाही. आपल्या परंपरेत असे म्हटले जाते की ज्ञानाशिवाय काहीही पवित्र नाही. ग्रंथालय कर्मचाऱ्यांची क्षमता विकसित करणे आणि लोकांना ग्रंथालयांकडे नेणे ही काळाची गरज आहे. प्रो. सिंह भारत सरकारच्या संस्कृिती मंत्रालया अंतर्गत कार्यरत असलेल्या राजाराम मोहन राय लायब्ररी फाउंडेशन, कोलकाता आणि महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय, वर्धा यांच्या वतीने सार्वजनिक ग्रंथालय कर्मचाऱ्यांसाठी राष्ट्रीय ग्रंथालय अभियान (एनएमएल) च्या 47 व्या क्षमता निर्माण कार्यक्रमाच्या उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रो. सिंह संबोधित करत होते. 7 ते 11 ऑक्टोबर 2024 या कालावधीत गालिब सभागृहात आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन सोमवारी करण्यात आले. यावेळी सेवाग्राम येथील जमनालाल बजाज मेमोरियल लायब्ररी अँड रिसर्च सेंटरचे निदेशक डॉ. सिबी जोसेफ, कुलसचिव प्रो. आनन्द पाटील, असोशिएट प्रोफेसर व कार्यक्रमाचे संयोजक डॉ.मनोज कुमार राय व्यासपीठावर उपस्थित होते.
कुलगुरू प्रो. सिंह म्हणाले की मानवी जीवनात ग्रंथालयाची भूमिका महत्त्वाची आहे. वाचनालय वाचकाला समृद्ध करत राहतात आणि ग्रंथालय कधीही अहंकाराची भावना मनात डोकावू देत नाही. ग्रंथालयाचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या योगदानाचा उल्लेख करून ते म्हणाले की त्यांनी भारतात ग्रंथालय शास्त्राचा पाया घातला आणि सार्वजनिक ग्रंथालयांची दारे सर्वसामान्यांसाठी खुली केली. डॉ. सिबी जोसेफ म्हणाले की ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम ग्रंथालये करतात. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ग्रंथालये डिजिटल केली पाहिजेत असेही ते म्हणाले.
या प्रशिक्षण कार्यक्रमात महाराष्ट्र, छत्तीसगड, तेलंगाना, गोवा या राज्यातून जवळपास 50 सार्वजनिक ग्रंथालयांचे कर्मचारी सहभागी झाले आहेत. देशाच्या विविध भागात आतापर्यंत 46 प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या कार्यक्रमातून ग्रंथालय स्वचालन सॉफ्टवेअर, गुणवत्ता पायाभूत सुविधा, संसाधने अद्ययावत आयटीसी उपकरणे तसेच तांत्रिक, सोशल मीडिया, ग्रंथालय संसाधनांचे संरक्षण व आधुनिक ग्रंथालय सेवांचे व्यवस्थापन यासंबंधी प्रशिक्षण दिले जात आहे.
कार्यक्रमाची सुरुवात महात्मा गांधी, राजाराम मोहन राय आणि डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या फोटोला पुष्पार्पण, दीपप्रज्वलन आणि कुलगीताने करण्यात आली. योगिता चकोले यांनी कार्यक्रमाचे संचालन केले. स्वागतपर भाषण डॉ. मनोज कुमार राय यांनी केले तर कुलसचिव प्रो. आनन्द पाटील यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
PIB Mumbai/CBC Wardha | H.Raut/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com
/PIBMumbai
/pibmumbai
Comments
Post a Comment