Gandhi Bhajans of Rashtra Sant Tukdoji Maharaj Marathi


 

या प्रीय भारताचा जीवप्राण बापु गेला ( गांधी गीतांजली )

(चाल : या प्रीय भारताचा का वीट...)

या प्रीय भारताचा जीवप्राण  बापु  गेला ।

झाली महान हानी भरवे न ही कुणाला ।।धृ0।।

चरखा धरोनि हाती तत्वार्थ सूत काती ।

त्यानेच पार  तोडी  परदास्य - शृंखलेला ।।१।।

शेतात राबणाऱ्या    मजुरासमान   रही ।

अन्याय हा जराही सहवे न त्या  जिवाला ।।२।।

सेवा करावयाची  जमनता - जमार्दनांची ।

ही नित्य बाणि ज्याची आदेश दे जनाला ।।३।।

हे जाति - पंथ सारे अति झूट स्पष्ट सांगे ।

परधर्म हेहि सारे असती समान   ज्याला ।।४।।

अपल्याच कीर्तिने जो झाला जगी महात्मा ।

अन्यायवृत्तिने पण त्यावरहि कहर  केला ।।५।।

तुकड्या म्हणे युगाचा, मानव्यता जगाचा ।

हे राम ! राम ! ! म्हणता रामीच लीन झाला ।।६।।

 

मोहन गेला सोडुनी ( गांधी गीतांजली )

 (चाल-रघुवर तुमको मेरी लाज...)

मोहन      गेला     सोडुनी ।

अति झाली जगाची हानी ।।धृ0।।

देउनिया  नवटृष्टि भारता ।

दावुनि मानवतेच्या पंथा ।।

स्वतंत्र करून देश आमुचा,

केले     सगळ्या      गुणी  ।।१।।

सत्याकरिता केली तपस्या ।

सोडूनि सर्व प्रलोभन-आशा ।।

विश्वासुनिया देवावरती,

लिन      झाला      प्रार्थनी ।।२।।

अमर कीर्तिंचा दिवा उजळला ।

रुढिप्रिय अंधार निरसला ।।

तृकड्यादास म्हणे सत्याचा,

मंत्र         जगा       दावुनी ।।३।।

 

भारतभूच्या प्रीय महात्म्या ! ( गांधी गीतांजली )

(चाल: कृष्ण कृष्ण मैं पुकारु...)

भारतभूच्या प्रीय महात्म्या !

तव यश   विजयी   राहू   दे ।।

स्वतंत्र झालेल्या देशाला, पुढे पुढे सरसावू दे ।।धृ0।।

क्षमा करी अपराध आमुचा, जो तुझ्याप्रति जाहला ।

वर्ष - वर्ष ना मिटे, जो डाग   हृदया   लागला ।

अज्ञ म्हणुनी सोड, पश्चाताप मानसि पावू दे ।।१।।

पूर्ण करण्या भावना तव, शक्ति सगळ्यांना असो ।

रामराज्यचि हो पुन्हा, ऐसी जनी भक्ती दिसो ।

पक्षांधता मतभिन्नतेचा द्वेष विलया जाऊ दे ।।२।।

कीर्ति व्यापू दे तुझ्या दुरदृष्टिची या    भूवरी ।

सत्यतेची-शांततेची रंगु   दे  जग - वैखरी ।

दास तुकड्या मागतो, मज नित्य तव गुण गाऊ दे ।।३।।

 

पूज्य गांधिची सद्गुणस्फूर्ती नसानसातुनि स्फुरे

(चाल - पटा तटाला फोडुनि...)

पूज्य गांधिची सद्गुणस्फूर्ती नसानसातुनि स्फुरे

भारता मोह न हा आवरे ॥धृ०॥

जिकडे - तिकडे रामराज्य हो ध्वनि हा गगनीं फिरे

घरोघरि वेडचि याचे भरे ।

जो तो अपुल्या शक्तियुक्तिने कार्य कराया झुरे

आमुचा देश गौरवे स्मरे ।

घराघरातुनि वीर शिपायी धावताति बावरे

घ्यावया आज्ञा  देती शिरे ।

ही प्रचंड शक्ती कोठुनिया उमलली ?

ही अवघड कोडी कशी कुणा समजली ?

ही मानवतेची युक्ति कशी उमगली ?

निःसंशय हे सिध्द जाहले तेज यशाचे भरे

भारता मोह न हा 0 ॥१॥

प्राण पणी लावता चेतले भारत चहुबाजुनी

न मानी काहि कुणाला कुणी I

जो तो सत्ताधीश मीच हे म्हणुनी शासन करी

बुद्धिला ठावच ना दे उरी I

जिवलग भारत देशाचा हा सोडुनि गेला वरी

जाहली जनता अति बावरी ।

या करु या बापूचे स्वप्न पुरे बोलती ।

संकल्प शेकडो झाले त्यांच्या प्रति ।

गजबजला भारत - देश  गुंगली मती ।

त्यांचिच ही परिणती भासते जिवंतपणा मनि भरे

भारता मोह न हा 0॥२॥

कधी न टळते वचन महात्मे बोलतात जे मुखे

फळाया येइ सुखे वा दुखे ।

जिवंतपणि त्या दोन हात परि मृत्यूने सारिखे

वाढती असंख्य बाहू मुखे ।

अमर तयांची वाणी वाणी जीवमात्र सारिखे

न कोणी बंद करुनिया रुके ।

सरकार असो वा प्रजा सर्व आपुले ।

हे समजुनि ज्याने पाय पुढे घेतले ।

नच सत्य - अहिंसे कधी कुठे सोडले ।

समान हक्कासाठिच त्याची कीर्ति दिंगती उरे

भारता मोह न हा 0 ॥३॥

समाज - शिक्षण समान -जिवन प्राप्त व्हावया जना

शेकडो कर्यांच्या योजना ।

काय - काय होईल भारती कळे न अजुनी कुणा

रंग हा वाढतसे नित दुणा ।

जाति - पंथ - संप्रदाय सारे विसरुनी ह्या भावना

सांगती म्हणा भारतिय म्हणा I

ही स्फूर्तिज्योति प्रगटली अता भारतीं ।

झळकला प्रगटला प्रकाश हा भोवती ।

सरकार - प्रजेची एकच व्हाया युती ।

तुकड्यादास म्हणे जनता ही जनपद - कार्या फिरे

भारता मोह न हा0॥४॥

 

राष्ट्रपित्याची अमर भावना पूर्ण कराया चला

( चाल : हटातटाने पटा रंगवूनि ... )

राष्ट्रपित्याची  अमर भावना पूर्ण कराया चला I

चला रे ! सगळे मिळुनी चला ॥धृ0

देश जाहता स्वतंत्र आता देशासाठी तुम्ही

तुम्हात्मा नाहि कशाची कमी ।

हे अपुले ते दुसरे म्हणूनी जिभा विटाळू नका

पहा राव नी रंक सारिखा ।

वीर शिपायी बना लडा जारि संकट आले कुणी

देश हा होऊ न ह्यावा ऋणी ।

( अंतरा ) ही प्रचंड शक्ती युक्ती घ्या पाठीशीं ।

सत्यास नम्र व्हा परि न नमा शुत्रुसी ।

येउ द्या मरण जरि आले या भूमिशी ।

सावधान व्हा करा तयारी सोडुनिया गलबला

चलारे सगळे मिळुनी चला ॥१॥

पहा - पहा हे चारि बाजुनी ऐकुं येते कसे

जीव हा उडू - उडू बघतसे ।

द्वेष कुणाशी नाश कुणाचा चोर कुणाच्या घरी ?

वाहवा ! न्याय घरीच्या घरी !!

ऐकायला कर्ण नको अणि नेत्र बघाया नको

जीव हा वैभव घ्यावा नको ।

( अंतरा ) ही जबाबदारी आली तरूणांवरी ।

भारता रक्षिण्या व्हा सगळे सामुरी ।

अन्याय करु नका पाहू नका यापरी ।

तुकड्यादास म्हणे यासाठिच देह प्रभूने दिला

चला रे ! सगळे मिळुनी चला ॥२ ॥

 

Comments

Popular posts from this blog

The 1924 Belgaum Congress Session:A Pictorial Narrative of Mahatma Gandhi’s Presidential Debut

30 जनवरी 2025 महात्मा गांधी स्मृति दिन

Online Learning Programme